पुणे : ‘सैन्य दलाचे कोणतेही ऑपरेशन हे गुप्तहेर खात्याने पुरविलेल्या माहितीशिवाय, मदतीशिवाय पूर्ण होऊ शकलेले नाही. सैन्यदलाला हवी असलेली ‘दुष्मन की खबर’ गुप्तहेर खाते नेहमीच पुरवीत असते. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’ हेदेखील अशाच खात्यांमधील एक आहे. गुप्तहेर विभागाच्या या सहकार्याबद्दल आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी आहोत,’ असे प्रतिपादन भारतीय सैन्य दलाचे विद्यमान उपलष्करप्रमुख आणि भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने, नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकाचे प्रकाशन लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ अर्थात ‘रॉ’चे माजी विशेष सचिव वप्पाला बालचंद्रन, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी लेफ्टनंट जनरल नरवणे म्हणाले, ‘गुप्तचर खाते म्हटल्यावर आपल्यासमोर थेट जेम्स बाँड येतो. इतकेच नाही तर गन्स, गिटार, ग्लॅमर म्हणजेच एखाद्या गुप्तहेराचे आयुष्य असा आपला समज असतो; मात्र तो चुकीचा असून, कधीही न पाहिलेले, ऐकलेले आणि नेहमीच पडद्यामागे राहणारे असे हे लोक असतात. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते करीत असलेली ही मदत सैन्य दलासाठी नेहमीच मोलाची ठरली आहे.’
नितीन गोखले लिखित ‘आर. एन. काव - जेंटलमन स्पायमास्टर’ या पुस्तकात गुप्तहेर खात्याच्या कामगिरीबरोबरच रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे पहिले प्रमुख आर. एन. काव यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मूळचे काश्मीरमधील असलेल्या काव यांची कारकीर्द या पुस्तकामध्ये वाचकांना अनुभवायला मिळेल.
या वेळी नितीन गोखले यांनी वप्पाला बालचंद्रन यांच्याशी संवाद साधून आर. एन. काव यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकून त्यांच्या काही आठवणींना, कामगिरीला उजाळा दिला.
वप्पाला बालचंद्रन म्हणाले, ‘आज आपल्या देशात सैन्य दलाकडे व गुप्तहेर खात्याकडे असलेली माहितीची कागदपत्रे नागरिकांना वाचण्यासाठी उपलब्ध नाहीत. सैन्य दल व गुप्तहेर खात्याकडील माहिती उघड करण्याची आज गरज आहे. यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानशी संबंधित माहिती, बांगलादेशाच्या निर्मितीवेळची कागदपत्रे व सुवर्णमंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन्सच्या कागदपत्रांचा समावेश असावा. यामुळे खरा इतिहास समोर येईल. युद्धाशी संबंधित बाबी आणि अतिमहत्त्वाची माहिती वगळता अन्य माहितीपत्रे उघड व्हायला हवीत. त्यासाठी लोकशाहीमध्ये नवे कायदे करण्याची गरज आहे. वीस वर्षांनंतर ही कागदपत्रे खुली करून त्याचा उपयोग होणार नाही. पाच ते दहा वर्षांत ती खुली करण्यात यावीत.’
‘आर. एन. काव हे स्वतः एक संस्था होते, ज्यांच्याकडे दूरदृष्टी आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी होत्या. गुप्तचर विभागाच्या कामगिरीवर बोलताना नेहमीच त्यांची आठवण होईल. कारण त्यांची निष्ठा ही त्यांच्या विचारांशी, देशाशी होती राजकारण्यांशी नव्हती,’ असे मत जयंत उमराणीकर यांनी व्यक्त केले.
(To read this news in English, please click here)